0मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला वीर शिंगरोबा यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा0

Wednesday, April 8, 2009

माझी उमेदवारी कशासाठी ?

माढा मतदारसंघातून एक तथाकथीत बलाढ्य उमेदवार उभा असताना महादेव जानकर यांचा तिथे टिकाव लागणार का, असे तर्क-वितर्क सामाजिक व राजकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहेत. मुळातच, समोर कोणता उमेदवार उभा आहे, हे पाहण्याची मला गरज वाटत नाही. मतदारसंघांची पुनर्रचना होत असतानाच दीड वर्षांपूर्वी मी माढ्यामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्यामागे विविध कारणे होती. माझे मुळगाव (म्हसवड येथील पळसावडे) याच मतदारसंघात आहे. साता-या जिल्ह्यातील या गावापासून सोलापूर आणि सांगली जिल्हे जवळच आहेत. त्यामुळे सातारा, सोलापूर व सांगली या तिन्ही जिल्ह्यातील भौगोलिक, सामाजिक, सास्कृतिक परिस्थितीची मला चांगली जाण आहे. शेती, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य इत्यादी समस्यांची जाण आहे. साहजिकच नव्याने निर्माण झालेल्या माढा मतदारसंघातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, माण-खटाव, फलटण हा सर्व भाग माझ्या पूर्ण परिचयाचा आहे. किंबहूना मी याच मातीतला आहे. म्हणून पूर्ण विचाराने आणि अभ्यासपूर्वकच या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मी निर्णय घेतला आहे.
खरेतर, अठरा वर्षांपूर्वी मी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडलो. प्रथम श्रेणी आणि सुवर्णपदक मिळाल्याने मला सहजपणे नोकरी मिळण्याची खात्री होती. पण कॉर्पोरेट जगतातील उंची पगार व सुखवस्तु आयुष्य जगण्यात मला स्वारस्य वाटले नाही. मी थेट समाजकार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एका प्रतिष्ठीत सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या महादेव जानकरला नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही याच्या डोक्यात समाजसेवेचे खुळ शिरल्याची टिका-टिप्पणी त्यावेळी माझ्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली. पण अशा टिका-टिप्पणीकडे दुर्लक्ष करून समाजकार्यात झोकून देण्याच्या निर्णयावर मी ठाम राहिलो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक या महापुरूषांनी मांडलेल्या विचारसरणीवर मी माझे कार्य करीत राहिलो. शेतकरी, गोरगरीब जनता, मागासवर्गीय समाज यांच्या समस्या जाणून घेतल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतक उलटून गेले तरी या गोरगरीब समाजापर्यंत स्वातंत्र्याची फळे पोहचली नसल्याचे कटुसत्य जाणवले आणि गलबलून आले. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी गोरगरीब, पिढीत, वंचित, गांजलेल्या जणतेला अद्यापही स्वातंत्र्य मिळाले नसल्याची जाणीव मला होऊ लागली. या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे प्रकर्षाने वाटू लागले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक आंदोलने, चर्चासत्रात सहभागी झालो. गोरगरीब समाजाच्या उपेक्षेला प्रस्थापित राजकारणीच जबाबदार असल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हाच मी ठरवले, जगायचे तर केवळ समाजासाठीच...!
समाजासाठी सर्व स्वार्थ बाजूला ठेवण्याचाही निर्धार मी केला. घराकडे कधी फिरकायचे नाही, लग्न करायचे नाही अशी खुणगाढ बांधूनच गेली अठरा वर्षे मी माझे कार्य सुरू ठेवले आहे. लोकांची सत्ता आणायची असेल, तर जिथे-तिथे आपले मुले, नातलग यांचीच वर्णी लावून चालणार नाही. गोरगरीबांमधील नेतृत्त्व पुढे यायला हवे, ही माझी धारणा आहे. त्यामुळे जे काही मी कमवेन, यश संपादन करेल, त्याच्यावर सर्वसामान्य लोकांचाच हक्क असेल. किंबहूना लोकांची सत्ता आणण्यासाठीच मी राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली आहे. प्रस्थापीत राज्यकर्त्यांनी देशाची सत्ता आपल्या कुटुंबापर्यंतच मर्यादीत ठेवण्याचे कारस्थान रचले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून मी लढवित असलेली निवडणूक तशी मला सोपीच वाटते. कारण माझ्यासमोरचे तथाकथित बलाढ्य उमेदवार हे प्रस्थापीत नेते आहेत. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नेतृत्त्व पुढे आणण्याऐवजी त्यांनी आपलीच मुलगी-पुतण्या व धनदांडग्यांनाच मोठे केले आहे. माढ्यातील गोरगरीब व वंचित जनतेच्या भल्यासाठी या नेत्याने काहीही योगदान दिलेले नाही, त्यामुळेच सर्वसामान्य जनतेमधून या नेत्याविषयी संतापाची भावना आहे. या उलट गेली दीड वर्षे मी या मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढले आहे. मतदारसंघातील जनतेशी माझी भावनिक नाळ जोडलेली आहे. शेतक-याचा मुलगा म्हणून जनतेकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंबहूना जनतेनेच ही निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे आग्रह धरला होता. खरेतर, आर्थिकदृष्ट्या माझी परिस्थिती कमकुवत आहे. तरीही या निवडणुकीसाठी जनता, कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जनतेचा हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन...!

- श्री. महादेव जानकर

0 comments:

About This Blog

Lorem Ipsum

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP